New

शंभुराजांचा अखेरचा निवाडा

शंभुराजांचं अस्तित्व 

शिवपुत्र शंभुराजे
       जिथे शिवपुत्र शंभुराजेनी अखेरचा निवाडा केला.काही काळ वास्तव्यास होते.तिथुनच काळाच्या कराल दाढेचा तब्बल चाळीस दिवसांचा यातनामय प्रवास सुरु झाला. आजच्या घडीला या वास्तुचे मोल अनमोल आहे.आजही ती स्पंदनं जाणवतात. थरकाप होतो जीवाचा.शंभुराजांचं अस्तित्व आजही जाणवणारी ही वास्तु पुरातत्व खात्याकडे  सोपवली जावी.तीचं संवर्धन व्हावं कारण स्मारकाचं योग्य ठिकाण तेच आहे.आज चौकात उभा केलेला पुतळा भव्य दिव्य आहे.पण जिथं शंभुपावलं अखेरची नांदली त्या वास्तुला दुर्लक्षीत नाही करता येणार. बाजुची अत्यंत देखणी शिव मंदिरे ढासळलीत.फक्त वटवाघळांचा मुक्त संचार आहे.बाकी शांत....इतकं पुरातन कोरीव काम पण दुर्दैवाने फक्त दुर्दशाच वाट्याला. कर्नाटकात हम्पीला वेगळं काय आहे? असाच वारसा जतन केलाय. आम्ही तिथे जावुन तिथले गोडवे गातो पण पुढ्यातला अलौकिक वारसा जपायचं राहुन जातं.

     सरदेसाईवाड्यासाठी आजवर प्रयत्न झालेही असतील. वंशजानी सन्मानाने खरं तर ही वास्तू सरकारकडे सोपवायला हवी. पालगडला साने गुरुजी राहीले ती वास्तु तिथल्या मंडळीनी दिली आहे.सगळ्या ठिकाणी हेच चित्र असताना शंभुराजेंच्या बाबत अनास्था का असावी? खरंच त्या परिसरात फिरुन यावं. तिथली पवित्र माती भाळी रेखावी आणि घ्यावा तो विलक्षण अनुभव. पुर्ण परिसर प्राचीन आहे. आजही तस्साच वाटतो.मंदिराच्या मागच्या बाजुने झाडापेडातून दौडत घोड्यावरुन राजियांची स्वारी कोणत्याही क्षणी येइल असं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. शहारे उमटतात.आज पडझड झालेल्या या वास्तु काळाचे आणखी किती फटकारे खाणार आहेत?

    साडेतिनशे वर्ष जसं राजांचा मानमरातब या मातीने कायम राखलाय तसंच निसर्गानेही या वास्तु इथवर राखल्या. कारण तिथं फिरली माझ्या राजांची पवित्र पावलं राजांची अटक झालेवर सरदेसाई वाड्याचा मागचा भाग जाळला पण जिथुन राजे निवाडा करत ती जागा आजही तशीच आहे.
     
           महामानव आंबेडकरांचे लंडन मधील घर ब्रिटीश जतन करतात याचं कौतुक आपण करतो. मग राजांच्या राज्यात त्यांची अखेरची वास्तु जतन करायला का पुढे व्हायचं नाही.
आज सरदेसाई वाडा कुठाय विचारलं तर तिथल्या कित्येकांनी माहीती नाही सांगितलं. आज ही अवस्था आहे तर पुढच्या पिढीला काय बघायला मिळेल?

          मर्द मावळे आपल्या राजांचं खरंखुरं स्मारक ताब्यात घेतील का?शासनाने आता पुढाकार घ्यावा. हा ऐतिहासिक ठेवा वारसा जतन करावा. या परिसरात अनेक मंदिरे कर्णेश्वर, सप्तेश्वर, कोणार्कच्या धर्तीवरचं सूर्यमंदिर आहे. नजरेचं पारणं फिटतं. पण दुर्दशा पाहुन अंतर्यामी वेदना होतात.आज तिथुन परतले पण सर्वस्व हरवल्यासारखी भावना मनात घेवुन.एकच विचार सातत्याने पाठपुरावा करतोय,"खरंच शंभुराजे इतके अभागी होते कि जिवंतपणी वंचना मृत्युही वंचनेत आणि साडेतिनशे वर्षानंतर अखेरची राजगादी जिथुन सांभाळली त्याचीही वंचनाच?
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत